पर्यावरण दिन आणि वनसंवर्धन दिनानिमित्त अनेक झाडांचे वृक्षारोपण
अहमदनगर -- दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि तेवीस जुलै रोजी वनसंवर्धन दिनानिमित्त निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आणि गितेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी अहमदनगर शहरातील ज्ञानेश्वरनगर येथे अनेक झाडांचे वृक्षारोपन केले आहे.
यावेळी त्यांनी निंब ,आंबा ,आवळा ,जांभूळ ,सीताफळ ,करंज ,वावळा ,रामफळ ,कढीपत्ता ,शेवगा अशा अनेक झाडांचे जागतिक पर्यावरण दिनी दहा झाडे आणि वनसंवर्धन दिनी दहा झाडे अशा एकूण विविध प्रकारच्या वीस झाडांचे वृक्षारोपण करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे .पर्यावरणाचे संवर्धन जर आपण केले नाही तर आपल्याला व आपल्या पुढील पिढीला आरोग्यसंपन्न जीवन जगता येणार नाही .झाडे आपल्याला फळे ,फुले ,सावली ,औषधे तर देतात परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे झाडे आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देतात आणि आपल्याला नको असलेला कार्बन डाय ऑक्साईड हा विषारी वायू शोषून घेतात.
झाडे हे आपल्याला जीवन जगण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत .आज जर आपण झाडे लावली नाही तर भविष्यात आपल्याला प्राणवायू मिळण्यास खूप अडचणी येतील .आपल्याजवळ कितीही संपत्ती असली तरी आपण या संपत्तीच्या जोरावर ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू तयार करू शकत नाही .ऑक्सिजन ची किंमत काय असते हे आपल्याला दवाखान्यात गेल्यावर समजते परंतु जी झाडे आपल्याला आयष्यभर मोफत ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देतात त्याची किंमत आपल्याला समजली पाहिजे .म्हणून झाड नाही तर आपण नाही .म्हणून प्रत्येकाने प्रतिवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले तर आपल्या सर्वांसाठी व देशासाठी हे फार मोठे कार्य उभे राहिल. म्हणून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा विचार सर्वांमध्ये रुजला पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे .तसेच समाजातील विविध ठिकाणी जाऊन त्यांनी लोकांना वेळोवेळी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणाचे महत्व सांगितले आहे .शिक्षक तुकाराम अडसूळ हे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी दहा ते वीस झाडांचे रोपे वाटतात .विद्यार्थी ही रोपे आपले घर व शेताच्या परिसरात लावून त्यांचे शंभर टक्के संगोपन करतात .शाळेतही त्यांनी प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून शाळेत निसर्गरम्य आनंददायी वातावरण तयार केले आहे. विविध उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणाचे मूल्य रुजविले आहे.गावातील लोकांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना विविध झाडांच्या या रोपांचे दरवर्षी वाटप करतात.गावातील लोकांनीही ही रोपांचे संगोपन केले आहे.शाळेत वर्षभर कोणत्याही कार्यक्रमात वृक्षारोपणासाठी झाडाचे रोप भेट देण्यात येते.तसेच पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या बरोबर राज्यातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन प्रत्येक वर्षी आयोजित करून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे कार्य समाजात अनेक ठिकाणी ते करत असतात .याबद्दल त्यांच्या या सामाजिक कार्याचे समाजातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा